शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की, “आज मी शेर आहे उद्या कुणीतरी दुसरा सव्वाशेर येणार”, या वक्तव्याची प्रचीती येण्याची स्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली असून शिवसेनेचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेलाच धक्का दिला आहे. ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटीमध्ये तळ ठोकला आहे.
आज भाजपसोबत सत्तास्थापनेचा दावा ते करू शकतात. यासर्व पार्श्वभूमीवरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार!”, असे नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.