मुंबई : मुंबई कोणाच्या बापाची नाही मी मुंबईत येणारच असं म्हणत कंगना राणावत मुंबईत दाखल झाली खरी, पण मुंबई एअरपोर्टच्या मागच्या रस्त्याने बाहेर पडली आणि घराकडे देखील मागच्याच रस्त्यानेच गेली. दरम्यान पालिहिल येथील कंगणाच्या ऑफिसमधील अनेक गोष्टी नियमाला धरून नाहीत असे सांगत बीएमसीने ऑफिसवर हातोडा चालवला दीड तासापेक्षा जास्त वेळ ही प्रक्रिया चालली. रिझवान सिद्धकी यांनी हाय कोर्टात धाव घेतली आणि या कारवाईला कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
मात्र बीएमसी ने आता कंगणाच्या खार येथील घराचे बांधकाम देखील नियमबाह्य आहे आणि ते पाडण्याची देखील परवानगी द्यावी अशी याचिका हाय कोर्टात दाखल केली आहे. कंगणाने बांधलेली बाल्कनी, त्यावर केलेले प्लांटेशन, स्टेअर केस जवळ केलेले बांधकाम असे तब्बल आठ बदल हे नियमानुसार नाहीत त्यामुळे ते पडण्याची परवानगी द्यावी. अशी याचिका बीएमसीने हाय कोर्टात केलेली आहे.
दरम्यान या सर्व कारवाईचा महाराष्ट्र भाजपाने निषेध केलेला आहे. सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचे मत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार घाबरट आहे आणि लोकशाही विरोधी काम करत आहे असे मत व्यक्त केले.
कंगणाला कोणीही सिरीअस घेत नाही, लोकांना हे सगळं आवडत नसतं, देशात अनेक महत्वाचे विषय आहेत हा विषय एवढा महत्वाचा नाही अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या संपूर्ण प्रवासात ट्विट वर ट्विट करणाऱ्या कंगनाने माझे घर तुम्ही तोडलेत तुमचा अहंकारदेखील तुटेल अशी प्रतिक्रिया व्हिडिओद्वारे दिली आहे. संपूर्ण व्हिडीओमध्ये कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. अद्याप शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसैनिकांनी मात्र एअरपोर्टवर आणि कंगणाच्या घरासमोर जोरदार निदर्शने केली.