शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करुन महाविकास आघाडीच्या अडचणी वाढवल्या आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या ठेवल्या. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी युती तोडून भाजपशी युती करुन हिंदुत्ववादी सरकार स्थापन करावे अशी त्यांची मागणी होती. ती मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती.
आता भाजप नेत्यांनी भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत तातडीने बोलावलं आहे. तसेच सर्व अपक्ष आमदारांना देखील उद्या मुंबईत येण्याचे आदेश दिले गेले आहेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचे बोलेले जात आहे. भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला सरकार स्थापन्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अॅंड वॉचची भूमिका असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यपालांना पत्र देण्याबाबात आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत.