भंडाऱ्यात काल राजकीय दृष्टिकोनातून अनेकांच्या भुवया उंचावणारी एक घटना घडली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काल भेट झाली. बंद दाराआड देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांच्यात पाच मिनिटं खलबतं झालं. या बैठकीचा तपशील कळू शकलेला नाही. परंतु या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक काल भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली. फडणवीस पालकमंत्री म्हणून पहिल्यांदाच बैठकीला आले होते. या बैठकीसाठी भंडारा जिल्ह्यातून आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीसा उशिरा पोहोचले. बैठकीमध्ये नाना पटोले यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. त्याला अधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तरं दिली.
सुमारे दीड तास ते पावणे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार होते. मात्र बैठक आणि पत्रकार परिषदेदरम्यानच्या पाच-सात मिनिटांच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोले यांची अवघ्या काही मिनिटांसाठी नियोजन अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी त्यांच्यासोबतचे राजकीय कार्यकर्ते आणि त्यांचे सुरक्षा पथकाला बाहेर ठेवले होते. या भेटीची आता सर्वत्र जोरदार चर्च सुरु झाली आहे.