मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली.
या अटकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत असून यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांना पाठिंबा दर्शवला आहे. ईडी कारवाईनंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजप, केंद्रीय यंत्रणांवर खरमरीत टीका केली आहे.
तसेच संजय राऊत यांचे समर्थन करीत, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे, असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये रविवारी सुद्धा सुरू ठेवावीत. केंद्र व राज्य सरकारने ED चा आदर्श घ्यावा, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, भाजपाने हर घर तिरंगा ही मोहिम आखली आहे. राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अनेक जिल्हे महापुरात आहेत, शेती वाहून गेली, महागाई वाढली, गॅस सिलेंडर महागले, कष्टकरी आणि गरीब माणूस रोज भरडत चाललाय तर दुसरीकडे ‘आजादी के 75 साल’च्या नावाखाली देशभक्तीचे सोंग सुरू असल्याची बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे.