आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठीची सर्व जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना फोन करून मुंबईतच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आज सकाळी 10 वाजता वर्षावर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांची एक बैठकही बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे प्रहारचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द बच्चू कडू यांनी येत्या तीन तासात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं बोलून दाखवलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना फोन केल्याचं वृत्त आहे. बच्चू कडू यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुंबईत बोलावलं होतं. तशी माहितीच बच्चू कडू यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही बच्चू कडू अमरावतीतच आहेत. ते अमरावतीच्या बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्यात येणार नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बच्चू कडू यांनीही सूचक प्रतिक्रिया देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. पण मी अमरावतीतच आहे. आता मंत्रिमंडळात सामील व्हायचे की नाही हे मी सकाळी 11 वाजता जाहीर करणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माझा निर्णय जाहीर करणार आहे. अमरावतीतूनच मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.