राज्यात यावेळी हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वरुणराजाने दांडी मारली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाशिवाय पेरणी शक्य नाही. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान आज राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांसाठी 12 जुलै ते 16 जुलैसाठी ‘यलो’ अलर्ट जारी हवामान विभागाने जारी केलं आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) हवामान अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.