पक्ष संघटन वाढीची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भाष्य केले आहे. पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी पक्ष संघटनेतील पदाच्या केलेल्या मागणीबाबत निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल,असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
बारामतीत सोमवारी (दि. २६) सकाळी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी, फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व पवारांनी केली तर मुत्सुदेगिरी या वक्तव्यावर देखील परखडपणे मत व्यक्त केले. यावेळी पवार यांनी मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे, असा सवाल केला तसेच भाजपाला जोरदार टोला लगावला होता.
१९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी स्टेटमेंट करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही,असा टोला पवार यांनी लगावला.