वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली यावरून राज्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते तर दुसरीकडे विविध पक्षाकडून विरोध होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कृतीच समर्थन केले होते अशातच मागच्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजी राजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या एका कृत्यामुळे या युतीची शक्यता धुसर झाली आहे. तसं सुतोवाचच संभाजीराजेंनी केलं आहे.
संभाजीराजे हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवर राजेंनी नाराजी दर्शवली. प्रकाश आंबेडकरांच्या कृतीचं समर्थन कसं करणार? प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार नाही. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या पलिकडे अजून काय बोलणार?, असा सवाल संभाजी राजेंनी केला.
पुढे राजे म्हणाले की, मी माझी भूमिका काल स्पष्ट केली आहे. ज्या शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना औरंगजेबाने ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्या संभाजी महाराजांची हत्या केली, ज्या ताराराणींनी सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला, अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची गरज काय? तुम्हाला अभिवादन करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडला गेले होते. तिथे गेल्यावर ते न चुकता रायगडावर गेले. तिथे झुडपं होतं, समाधीच्या ठिकाणी पोहोचण्याची अडचण होती. पण बाबासाहेब गेले आणि त्यांनी त्यांना अभिवादन केलं, असंही संभाजीराजे म्हणाले.