सध्या राज्याच्या राजकारणात 50 खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिंदे गटात वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेतील बंडानंतर 50 खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात झाली आणि पुढे त्यावरून शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवराळ भाषेत उत्तर दिलं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. त्यावर शिवतारे म्हणाले माझा सुप्रिया सुळेंना सवाल आहे. शिवतारे म्हणाले, माझा अजित पवारांवर विश्वास आहे. मात्र पहाटेच्या शपथविधी वेळी अजितदादांनी किती खोके घेतले. हे विचारून महाराष्ट्राच्या जनतेचे सांगावे. 1978 साली शरद पवारांनी शरद पवारांनी सरकार स्थापन करण्यासाठी 38 आमदार फोडले होते. त्यावेळी शरद पवारांनी किती खोके दिले हे देखील आम्हाला सुप्रिया सुळेंनी आम्हाला सांगावे.