बार्शी :
बार्शी नगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कामासाठी नेहमीच तत्पर असतात, याचा प्रत्यय बार्शीकरांना अनेकदा आला आहे. गेल्याच महिन्यात लातूर रोडवरील पुलाच्या पाण्यात अडकलेली गाडी काढण्यासाठी येथील इन्चार्ज पाडुळे यांनी रात्री 11 वाजता कर्मचारी ऑन द स्पॉट पाठवले होते. आता, पुन्हा एकदा येथील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचं आणि संवेदनशीलतेचं दर्शन घडलं आहे. सोमवारी सायंकाळी शेंद्री फाट्याजवळ झालेल्या अपघातातील जखमींजवळ अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत, त्यांना रुग्णालयात दाखल केले.
#बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रामुळे ग्रामीण भागातील अनेकांची सोय झाली आहे. मात्र, अदयापही यंत्रणा कमीच पडत असून नेहमीच त्याचा निष्काळजीपणा दिसून येतो. अपघातस्थळी काही मिनिटांतच 108 रुग्णवाहिका पोहोचण्याची हमी सरकार देते, पण तसं बहुतांशवेळा घडतच नाही. म्हणूनच, अपघातग्रस्तांना दुसऱ्या वाहनाने रुग्णालयात न्यावे लागते. शेंद्री फाट्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातानंतर 108 रुग्णावाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा त्या यंत्रणेची अनास्था उघडी पडली. त्यावेळी, पोलिसांनी कॉल केल्यामुळे बार्शीतून अग्निशमन दलाच्या गाडीने धाव घेतली आणि अपघातग्रस्त युवकाला येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महादेव कोळेकर असे जखमी युवकाचे नाव असून ते तांदुळवाडीचे रहिवाशी आहेत. अग्निशमन गाडीचे ड्रायव्हर अजय कांबळे, फायरमन, नागेश पोकळे, प्रकाश जाधव आणि स्वप्नील बळे या बहाद्दरांनी संवदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा जपत वेळेतच अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले. स्वत:च्या अंगावरील कपड्यांचा किंवा मी कसं याला उचलू, हा विचार न करता सर्वप्रथम माणूसकीची कृती केली. त्यामुळे, एका कुटुंबातील कर्त्या माणसाचा जीव वाचला.
अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या माणूसकीचं आणि कर्तव्यपरायणतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा 108 तातडीची सेवा फोल ठरल्याचं सिद्ध झालंय.