मुंबई |
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ‘त्यांनी आता पदावर रहाण्याविषयी पुनर्विचार करावा’, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
“महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजेआहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोक कल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्बुद्धी लाभो, ही प्रार्थना…” अशा शब्दात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.