नागपूर |
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेकडून विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयांचा पदव्युत्तर संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्यं आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केलं.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, जगाची दिशा शहरीकरणाकडे आहे, जग शहरी होताना दिसतंय. अजून १०० वर्षानी शहरी, ग्रामीण, आदिवासी असा फरक जगात तरी राहणार नाही. जग शहरी होणार. जगाची दिशा तीच आहे. मग असं असेल तर महाराष्ट्र तर यात अगोदरच अग्रेसर आहे. या परिस्थितीचा आपल्याला फायदा घेता येईल का, ते पहायला हवं. महाराष्ट्रात या प्रक्रियेला सकारात्मक, रचनात्मक वळण देता येईल का हे बघणं आवश्यक आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले कि, सर्वच क्षेत्रांत महिलांचा वाढता सहभाग, नव्या अर्थरचनेत “शासन” या संस्थेचं बदलतं स्वरूप, कुटुंब, शाळा यांसारख्या सामाजिक संस्थांची बदलणारी गरज, जगातला संस्कृती संघर्ष यासारख्या गोष्टींचाही परिणाम महाराष्ट्रावर, महाराष्ट्रातील लोकांवर होईल ज्याचा आपल्याला आवर्जून विचार करावा लागेल, अशी भूमिका मांडून मतदारसंघातील विकासकामसंदर्भात माहितीही त्यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी, विद्यार्थी इतर मान्यवरही उपस्थित होते.