मुंबई |
शरद पवार यांनी एकाच वेळेस गुगली आणि सिक्स मारले. शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना १०० जन्म घ्यावे लागतील. शरद पवारांनी गुगली टाकली नसती, तर एखादे वेगळे खोके सरकार येईपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहिली असती. पण, शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष वारंवार क्लिनबोल्ड झाला, असा टोला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सरकारच्या वर्षपूर्तीवरूनही राऊतांनी टीका केली आहे. “आम्ही सरकारकडे सरकार म्हणून पाहत नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याला आणि विश्वासघाताला एक वर्ष पूर्ण झालं,” असं टीकास्र संजय राऊतांनी शिंदे गटावर सोडलं आहे.