पुणे |
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून, सोमवारी राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना फोन केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. त्यावर राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांकडून येणारे वक्तव्य आणि प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. सर्व पक्षांनी एकत्र येवून यावर विचार करायला पाहिजे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यावेळी पेटी, खोके शब्द नव्हता का? याची सुरुवात कोणी केली? सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना टार्गेट केलं जातं हे देखील योग्य नाही. खोके हा विषय कसा सुरू झाला? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदें यांना सारखं बदनाम केलं जात असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मी कुणाचं नाव घेतलं नाही, मी टोप्या फेकतो, ज्याच्या डोक्यावर बसेल ती बसेल असंही पाटील यावेळी म्हणाले. हर हर महादेव’ या चित्रपटावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा त्यांनीच दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करायचा असा हा प्रकार आहे. कायदेशीर मार्गाने देखील विरोध करता येणे शक्य असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.