मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेच्या अडचणी वाढवल्या असून थेट मुंबई मानपामधील भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन छेडले आहे. कोविड काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात युवा सेनेचा पदाधिकारी वैभव थोरात आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ईडी आणि ईओड्ब्लूकडे तक्रार केली होती.
या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती. मुंबई महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी या आधीच चौकशी लावली आहे. त्यानंतर आता ईडी आणि इओड्ब्ल्यू सुद्धा चौकशी करणार आहे.
ह्या घटनेचे वेगवेगळे ॲंगल्स आहेत, त्यामुळे विविध एजन्सीजला तक्रार दिली आहे. २५-३० कोटी पर्यंत हा भ्रष्टाचार झाला आहे, याची व्याप्ती ७०-७५ कोटींपर्यंत देखील जाऊ शकते. आम्ही ईओडब्ल्यूकडे देखील तक्रार केली आहे.
तसेच मनी लाँड्रिंगचा देखील ॲंगल आहे.त्यामुळे ईडीकडे देखील तक्रार केली आहे. पालिकेकडे देखील तक्रार केली आहे. विविध पुरावे दिले असले ती ते कन्फर्म करणं एजन्सीचं काम आहे, त्यामुळे विविध ठिकाणी तक्रार केली आहे. आम्ही वारंवार सांगत होतो, विरप्पन गॅंगनं मुंबईला लुटण्याचं काम केलं आहे.कोरोना काळात विरप्पननं जेवढं लुटलं नसेल तेवढं या गॅंगनं मुंबईला लुटलेले आहे, याचे पुरावे देखील सादर केले आहे, असंही देशपांडेंनी सांगितलं.