राजा माने यांजकडून..
पुणे, दि- मकरंद अनासपुरे यांच्या संगतीने “नाम फाउंडेशन” च्या माध्यमातून देशापुढे जलसंवर्धन आणि ग्रामविकासाचा आदर्श ठेवणारा आणि बॉलीवूडमध्ये “नाना”नावाचा मराठी दबदबा निर्माण करणारा नाना पाटेकर! हाच नाना आपला मान समाजसेवा आणि प्रशासकीय सेवेत इतिहास घडवित असलेल्या दुसऱ्या “स्वच्छ नाना”ला देवून त्याचा सन्मान करतो आणि टाळ्यांच्या कडकडाटाने बालगंधर्व रंगमंदिर दुमदुमून जाते.
हा क्षण सभागृह भारावून टाकणारा नि भावनाप्रधान प्रसंग परवा पुण्यात घडला. महाराष्ट्रापुढे एक समाजसेवेचा नवा पॅटर्न ठरलेल्या बार्शी तालुका कृषी पदवीधर संघटना आणि मातृभूमी प्रतिष्ठान सारख्या संस्था उभारण्याची संकल्पना मांडून ती साकार करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे “स्वच्छ नाना”.. सुपर क्लास वन अधिकारी.. गेल्या २५ वर्षांत लातूर,सांगली पासून मुंबईपर्यंतची सर्वोच्च “मालदार पदे”, अनेक वर्षे अनेक कॅबिनेट मंत्र्याचे खाजगी सचिव राहिलेले आणि सध्या कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाजगी सचिव पदावर कार्यरत असलेले महाराष्ट्राच्या सहकार विभागाचे सहसचिव “स्वच्छ नाना”..अर्थात संतोष पाटील इर्लेकर शंभर वर्षाचा समृद्ध इतिहास असलेली बंद पडलेली जिल्हा बँक जिवंत करणे असो,राज्याच्या सहकार कायद्याचा ड्राफ्ट बनविणे असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती प्रक्रिया असो वा कृषी धोरण असो त्यात महत्वाची भूमिका निष्ठेने बजावणारे संतोष नाना राज्यात एक स्वच्छ, साधे, चारित्र्य संपन्न आणि भ्रष्टाचारमुक्त अधिकारी म्हणून शासन दरबारात लोकप्रिय आहेत.
अशा नानाचा सन्मान अभिनेते नाना पाटेकर यांनी स्वतःचा मान त्यांना देऊन केला.
२५ मे २०२५ रोजी बालगंधर्व, पुणे येथे समाजसेवी तथा निवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी मोठ्या कष्टाने घडविलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या आदर्श गावाच्या माहितीपट टिझरचे प्रकाशन सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ठरले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरु झाला आणि तो क्षण आला.. नाना पाटेकर यांनी महितीपटाच्या टीझर चे प्रकाशन स्वतः न करता हा मान संतोष पाटील यांना दिला आणि दुसऱ्या “स्वच्छ नाना”चा अनोखा गौरव केला. संतोष पाटीलही काही क्षण भांबावले नंतर मात्र त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. यातून मानवी आयुष्यात प्रामाणिकपणा जीवनातील सर्वात प्रबळ अस्त्र आहे हे आधोरेखित होतेय.