“वरळी-ठाणे जाऊ द्या, अधिवेशनापूर्वी ‘ही’ गोष्ट करुन दाखवा”; थेट आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
नागाच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर घणाघाती टीका करताना दिसून येत आहे. अशातच . आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना नवे आव्हान दिले आहे.आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर तुम्ही वरळीतून निवडणूक लढवणार नसाल, तर मी ठाण्या येऊन निवडणूक लढवतो, असे आव्हान देण्यात आले.
या आवाहनानंतर यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवे आव्हान दिले आहे. वरळीतून लढून दाखवण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. वरळीतून नसेल तर ठाण्यातून तरी लढून दाखवा असे त्यांना सांगितले आहे. त्यांना आणखी एक चॅलेंज देतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यपालांचे भाषण होण्यापूर्वीच महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवावे, असे नवे आव्हान आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला दिले आहे.
राज्यपालांना जायचे आहे. त्यांनी तसे पंतप्रधानांना कळवले आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर बोलत नाहीत. हे चित्र महाराष्ट्रासाठी घातक आहे, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे माझ्याविरोधात वॉर्डातून लढण्यास तयार असतील तर मी वॉर्डातून लढण्यास तयार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर उद्योग का जातात? त्यावर माझ्याशी समोरासमोर चर्चा करा असे आव्हान दिले होते. पण त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यानंतर एअरबस प्रकल्प गेला. बल्क ड्रग्सपार्क प्रकल्प गेला. २६ हजार कोटीचा आणखी एक प्रकल्प राज्यातून गेला. उद्योगावर ते बोलू शकले नाहीत आणि चॅलेंज स्वीकारू शकले नाहीत, असे सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.