नागपूर | नागपुरात ठाकरे गटावर कार्यालय रिकामं करण्याची वेळ आली आहे. वर्षभराचे भाडे आणि वीज बिल थकवल्याने गणेशपेठ येथील कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि खासदारांना पळवल्यानंतर कार्यकर्ते जोडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. असे असताना आता विभागीय कार्यालय सुद्धा शिवसेनेकडे उरले नाही.
शिवसेना कोणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेने दावा केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे सेनेने खासदार, आमदारांसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा पळवले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईत बोलावून बैठका घेतल्या.
भाजप आणि शिंदे सेनेसोबत दोन हात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विदर्भाचे दोन दौरे केले. काही दिवस ते मुक्कामीसुद्धा होते. भाजपसाठी जागा सोडल्या ही आमची चूक झाल्याचे मान्य करून विदर्भात सेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या दरम्यान शिवसेनेच्या बैठका शिवसेनाभवना ऐवजी नागपूरचे संपर्क नेते दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यालयात होत असल्याने अनेकांनी आक्षेपसुद्धा नोंदवला होता.
तसेच मुंबईपर्यंत याच्या तक्रारी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. याची दखल घेऊन पक्षसंघटनेची बैठक शिवसेना भवनातच घ्यावी असे आदेशही मुंबईच्या नेत्यांनी दिले होते. मात्र याची दखल कोणी घेतली नाही. आता तर शिवसेनेचे कार्यालयाच अस्तित्वात राहिले नाही