२०२२-२३ चा ऊसाचा गाळप हंगाम बऱ्याच ठिकाणी संपला असून अनेक ठिकाणी तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा कारखान्याला ऊस जाऊन दोन महिने उलटले तरीअद्याप काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे अदा केले नाहीत.
याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील ऊस गेलेल्या परंतु ऊसबिल थकवलेल्या सर्व साखर कारखान्यावर RRC ची कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. अन्यथा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन चंदेल असा इशारा दिला आहे.
पंढरपूरातील ऊस जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्याला जातो. यामध्ये मंगळवेढा, माळशिरस, माढा, मोहोळ तालुक्यातील साखर कारखान्याला शेतकरी ऊस पाठवतात. सर्वच साखर कारखान्यांनी कमी अधिक प्रमाणात ऊस बील थकवली आहेत. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. मार्च एंड असल्यामुळं बँक, सोसायट्या, फायनान्स, पत संस्थासह खत-औषध दुकानदारांनी 31 मार्चच्या आत पैसै भरण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावला आहे.
आज अनेक शेतकऱ्यांची वाहने फायनान्स ओढून नेत आहेत. बँकेची अधिकारी शेतकऱ्यांच्या दरात चकरा मारत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ उसबिले मिळणे आवश्यक असल्याचे मत पंढरपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी व्यक्त केलं आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.शेतकऱ्यांना वेळेत पैसै मिळाले नाही तर तुटुन गेलेल्या ऊसाची मशागत, खत, पाणी, औषध, फवारणीचे व्यवस्थापन वेळेत होणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पुढील वर्षीच्या ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं पंढरपूर तालुक्यातील ऊस गेलेल्या परंतू, उसबिल थकवलेल्या सर्व साखर कारखान्यावर RRC ची कारवाई त्वरीत करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा पाटील यांनी दिली आहे.