गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तसीच जगभरातील तमाम मराठी बांधवांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात होत असेलेल्या शेतकर्यांच्या नुकसानीवर राज्य सरकार म्हणून चिंता व्यक्त केली आहे या अवकाळी पावसाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, गुढीपाडवा फक्त नव्या वर्षाचे स्वागत नाही तर नव्या संकल्पांचा सण आहे. नव्या विचारांची, नव्या कृतीची आणि नव्या स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे.
चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.
अजित पवारांच्या गुढीपाडव्याच्या तमाम मराठी बांधवांना शुभेच्छा
तसेच अजित पवारांनी सुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनातल्या आशा-आकांक्षा, मनातली स्वप्ने पूर्ण होवोत. नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रवासियांना, मराठीप्रेमी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.