एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अद्यापही शिवसेना त्या धक्क्यातून सावरताना दिसत नाही. ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. या डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कामाला लागले असून, अधिकाधिक सक्रीय होताना पाहायला मिळत आहेत. यातच बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अगदी शेवटी शिंदे गटात सामील झालेले बंडखोर आमदार संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, संतोष बांगर यांनी या कारवाईला आव्हान देत पदावरून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
राज्यात शिवसेनेच्या ४० आमदारांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत संधान बांधून सरकार स्थापन केले आहे. सुरुवातीला संतोष बांगर यांनीही शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला होता. नंतर त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत मूळ शिवसेनेला धक्का दिला होता. शिंदे गटात जाण्यापूर्वी मात्र त्यांनी बंडखोरांना आधी ढसाढसा रडून परत येण्याचे आवाहन केले होते. नंतर जिल्हाभर दौरे करून बंडखोरावर वादग्रस्त टीका केली होती. बंडखोरांना त्यांची बायका मुले सोडून जातील, या वक्तव्याने राज्यभर चर्चेत आले होते. मात्र विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी शिंदे गटात सामील होत आपण खऱ्या शिवसेनेसोबत गेल्याचे सांगितले होते.