खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजतात. क्रांतिकारक घाबरत नसतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचं आव्हान स्विकारावं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य यांच्या समोर लढावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून, आम्ही कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक एकत्र लढणार असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दरम्यान काल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी शिवसेनेत उद्भवलेल्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत होणाऱ्या बंडाबाबत आधीच सावध करण्यात आलं होतं. स्वत: शरद पवार यांनी या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. मी देखील सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या लोकांवर डोळे मिटवून विश्वास ठेवला आणि नको तेच झालं शिवसेनेत फूट पडल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता अजित पवार यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे.
राऊत म्हणाले की, आम्ही देखील उद्धव ठाकरे यांना बंडाबाबत वेळोवेळी सांगत होतो. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजतात. क्रांतिकारक घाबरत नाहीत, त्यामुळे आता शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि 32 वर्षांच्या तरुणाचं आव्हान स्विकारून निवडणूक लढवावी असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.