मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. “भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे.
भक्त आंधळे असतात, हे माहिती होतं. पण गुरूसुद्धा आंधळे असतात, हे माहिती नव्हतं. आम्ही बीएमसीला सक्षम बनवलं त्यानंतरच फिक्स डिपॉझिट तयार झालं”, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत आशिष शेलार यांनी हे आरोप केलेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. मी शेठजी यासाठी म्हणतो, की त्यांनी धनडांगग्या शेठजींसाठी कामं केली. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. मनपाच्या ठेवींबाबत बोलताना तेच म्हणाले की हे ठेकेदारांचे पैसे आहेत.
आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेल्या दरोड्यांपासून मुंबई महापालिका वाचवणं महत्त्वाचं आहे. यासाठी भाजपा मुंबईकरांबरोबर आहे.” “एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. स्वतःच्या कुटुंबातील बंधूंनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. पक्षही एकत्र ठेवला नाही. गणेश नाईक ते नारायण राणे सगळेच त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. सरकारही वाचवू शकले नाहीत. अशा अपयशी माणसाच्या बोलण्याला महत्त्व द्यायचं नाही, असं मुंबईकरांनी ठरवलंय”, असंही आशिष शेलार म्हणालेत.