राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर शहर अन् जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा व्यक्त केली, मात्र त्याच वेळी या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह कोणावरही टीका करू नका, असे सातत्याने सांगितले गेले. तर दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सवाल विचारला आहे.
संजय राऊत यांनी भाजपला आव्हान देत म्हटले की, “फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू” मात्र यावर शिवसेनेचेच नेते भास्कर जाधव यांनी टोला लगावला आहे.
“ही आव्हाने द्यायची वेळ नसून आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री निघून का गेले हे समजून घ्यायला हवे. मी तेव्हाही सांगितलं होतं की, आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्री पद अपक्ष आमदारांना का दिली?”, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.