पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. तुमचा दलाल महाराष्ट्रात बसला होता. राज्यपाल मला पत्र लिहून तुम्हाला साक्षात्कार होतो का असे विचारत होते. मंदिरे उघडा म्हणून सांगत होते. मी मंदिरे उघडली नाहीत. सर्व धर्मियांची उघडली नाहीत, या सर्वांनी माझे ऐकले असे म्हणत थेट राज्यपालांसह ताटकालीन विरोधकांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
प्रवासी मजूरसुद्धा तिकडे जाऊन सांगत होते, आमच्या राज्यात काहीच नाही महाराष्ट्राचे सरकार आमची काळजी घेत होते. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवताय, शिंदे गटाची शेपूट एवढी आत गेलीय. भाजपाच्या कार्यालयांवर, नेत्यांच्या बॅनरवर असे हातोडे मारण्याची हिंमत ठेवाल का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला.
उद्धव ठाकरे आज शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आम्ही भीक मागू, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडणार नाही, असे मला नगरसेवकाने सांगितले. अनेकांना फोन येतायत. पोलिस करतायत. मला त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव समजलेय त्याला काय निरोप द्यायचा तो दिलाय, असे ठाकरे म्हणाले.
तसेच त्यांच्याकडे खोके आहेत, आमच्याकडे जनता आहे. उपरा, दलाल येतोय आणि आमच्या मराठी माणसांवर दादागिरी करतोय. माझ्यासाठी मुंबा आई आहे तर तुमच्यासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या. नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका घेतील. ज्या पद्धतीने त्यांचे बदनाम करायचे काम सुरु आहे ते पाहता तेव्हा होतील. माझ्या घरात एकही पैसा आलेला नाही. जर चौकशी करणार असाल तर ठाणे महापालिकेची करा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, उत्तर प्रदेश इथली देखील करा, असे ठाकरे म्हणाले.