Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे सरकारच्या काळात दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर खैरात, फाईल ओपन होणार?

0

२०२१-२२ अबकारी धोरणच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. त्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात असून, महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार, असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे, तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. विदेशी दारुवरील कर माफ करण्यात आला होता. बार, पबच्या परवाना शुल्कात सवलत देण्यात आली होती.

वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी देण्यात आली होती.आता दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच श्री.अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले होते? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात? अशा प्रश्नांची सरबत्ती आशीष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.

दरम्यान, मद्य घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण २०२१-२२ च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना आज राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.तेव्हा त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.