बोगस शपथपत्राप्रकरणी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली हजारो शपथपत्रे बोगस असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करण्यासाठी पाठवले होते.
मात्र अखेर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने हा खुलासा केला गेला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर शिंदे गटाकडून शिवसेना पक्षासह चिन्हावरही दावा करण्यात आला होता. आमचीच खरी शिवसेना असून आम्हाला पक्ष व चिन्ह आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती.
निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शपथपत्रे दाखल केले होते. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेले जवळपास साडेचार हजार शपथपत्रे बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. कोल्हापूरसह नाशिक, पालघर, अहमदनगर यासारख्या राज्यात पोलिसांची पथक दाखल झाले होते व तपास करण्यात येत होता.
बोगस शपथ प्रतिज्ञाप्रकरणी अखेर गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असून ही शपथपत्र बोगस नसल्याचा खुलासा गुन्हे शाखेने केला आहे. गेले तीन दिवस आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रतयेकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली होती. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे की नाही याची खातरजमा केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.