राहुल गांधी यांनी सावरकर विरोधात केलेल्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नाही हे आम्ही स्पष्ट केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, या यात्रेत वीर सावरकर यांचा विषय काढण्याची काही गरज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले.
तसेच हा विषय काढल्यामुळं फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव असं राऊत यावेळी म्हणाले.
वीर सावरकारांना भाररत्न द्यावा अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आम्ही ही मागणी करत आहोत. मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून का धरत नाहीत? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. आता राऊत यांच्या या विधानावर काँग्रेस सह सत्ताधारी शिंदे-फडणवीस गट काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.