महाराष्ट्राच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या अशा 11 ताऱ्यांचा उल्लेख केला. पण पंतप्रधानांच्या 11 ताऱ्यांपैकी महत्त्वाच्या ताऱ्यांचा अपमान होतोय, त्यावर कुणीच काही बोलत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. तेआज माध्यमांशी वळत असताना त्यांनी ही टीका केली आहे.
सूर्यावर थुंकणारे व्यासपीठावर बसले असताना, हे तिथे कसे बसू शकतात, असा सवाल राऊत यांनी केला. कर्नाटक सीमाप्रश्नावर पंतप्रधान काहीतरी बोलतील, मुख्यमंत्री काही बोलतील, यासाठी महाराष्ट्र कानात प्राण एकवटून बसला होता, पण हे ओशाळलेपणाने तिथे दिसून आले, अशी खंत राऊत यांनी बोलून दाखवली.महाराष्ट्राला विकासाचे 11 तारे आम्ही देतोयत, असं पंतप्रधान म्हणाले. त्यातला पहिले दोन तारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हे आहेत. त्या दोन्ही ताऱ्यांचा अवमान झालाय.
छत्रपती शिवाजी महाराज हे तारे नाहीतच. ते प्रखर सूर्य आहेत. त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. ताऱ्यांच्या कशाला गप्पा मारतायत? आम्हाला वाटलं, राज्याचे मुख्यमंत्री चिंतामणराव देशमुखांप्रमाणे पंतप्रधानांना विचारतील… की महाराष्ट्राचा अपमान करणारे व्यक्ती व्यासपीठावर असताना तुम्ही कसे आलात? असा सवाल राऊत यांनी केला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ती थाप बहुधा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्याबद्दलची शाबासकी असावी अशी टीका राऊत यांनी केली.