ठाणे | ‘गेले ते कावळे, उरले ते मावळे’ यावर आमचा विश्वास असून, शिवसेना ही नेहमी संघर्षातूनच उभी राहते. त्यामुळे खचून जाऊ नका. शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून, आपल्यासारख्या शिवसैनिकांच्या रूपाने नवी पालवी फुटली असल्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. आता गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असा निर्धार विचारे यांनी व्यक्त केला.
शिवसेनाठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा विभागीय मेळावा नुरी बाबा दर्गा रोड येथील अनुराधा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना प्रवक्ते चिंतामणी कारखानीस, शहरप्रमुख प्रदीप शिंदे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे असल्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या प्रभागातील मतदार यादी अत्यंत बारकाईने चाळून घ्या, नागरिकांशी थेट संवाद करायला सुरुवात करा, असे राजन विचारे यांनी सांगितले.