मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून कित्येक वेळा महाराष्ट्रातील अनेक नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतकेच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा एकेरी उल्लेख झालेला आहे. तसेच अनेक आरोप हे कोणत्याही पुराव्याशिवाय लावण्यात आल्याने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. तसंच हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामींवर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली
प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत भाजपने गदारोळ घातला . या प्रस्तावानंतर दरम्यान, हा राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली.
“अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशांच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असा घणाघात परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.