मुंबई | राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने आज आपले मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपावर एकूण नजर फिरवली तर या संपूर्ण मंत्रिमंडळावर भाजप आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचष्मा दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती भाजपकडे असल्याने याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
पाटोळे म्हणाले की, शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर नाना पटोले यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून शिंदे गटाला डिवचलं आहे. फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली.. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल ! असं ट्विट करत नाना पटोले यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत.गृह,अर्थ,महसूल,वने, ग्रामविकास, सहकार,जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला? असा सवाल त्यांनी केला.