राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा गेले ३८ दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली.भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप मिळाले आहे. तर, पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला तीनच मंत्रीपदे आली आहेत.
मात्र, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे, हे दोन्ही जिल्हे सध्यातरी पोरकेच आहेत. शिंदे सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, उत्तर महाराष्ट्रातील 5 आमदारांना मंत्रीपद मिळालं असून मराठवाड्याच्या खात्यात 4 मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात केवळ 3 मंत्रीपदं देण्यात आली असून कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा या मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आल्याचे दिसून आले. सोलापूरातून एकमेव बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील शिंदे गटात सामिल होते. तर, कोल्हापूरातून माजी राजेश क्षीरसागर हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांना मंत्रीपदी संधी मिळाली नाही. चंद्रकांत पाटील हे मूळ कोल्हापूरचे असले तरी त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा पुण्यातील कोथरुड आहे. त्यामुळे ते पुण्याचे मंत्री राहतील.