भारताकडून कांद्याची आयात करणारा प्रमुख देश म्हणून बांग्लादेशकडे बघितले जाते. बांगलादेश मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी भारताकडून करतो. एकूण कांदा निर्यातीच्या 60 टक्के कांदा बांगलादेशला भारत निर्यात करत होता. परंतू, केंद्र सरकारचे आयात निर्यातीबाबतचे लहरी धोरण, अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून बांगलादेशने भारताकडून होणारी कांद्याची आयात थांबवली आहे.
या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच बांगलादेश जर आमचा कांदा घेणार नसेल कांद्याच्या त्यांच्या आयात होणाऱ्या कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करा असे शेट्टींनी म्हटलं आहे. भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून बांगलादेशने भारताचा कांदा आयात होणार नाही याची दक्षता घेतली आहे. इराककडून मोठ्या प्रमाणात बांगलादेशने कांदा खरेदी केला असल्याचे शेट्टी म्हणाले. आपण एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो आहे. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बंदी असल्याचे शेट्टींनी म्हटलं आहे.
दुष्काळात 13 वा महिना या म्हणीप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी बंद करुन आपलाच खरेदी केलेली कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारनं आता खडबडून झोपेतून जागं व्हावं आणि नाफेडची कांदा विक्री बंद करुन खरेदी सुरु करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.