मुंबई | शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषी विभागानं आपल्या सर्व योजनांचा प्रभावी अंमलब करावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा असंही ते म्हणाले. पुण्यातील कृषी आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. यावेळी कृषी अधिकायांना निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांना जी बियाणे पुरवण्यात येणार आहेत, त्याबद्दलही जागरुक राहावं. उत्तमातील उत्तम बियाणे कसे मिळतील यादृष्टीने कार्यवाही करावी असे मंत्री सत्तार म्हणाले. राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी सातत्याने संशोधन करुन बियाणे निर्माण करावीत. खासगी बियाणे उत्पादक यांच्यासोबत बियाणांच्या बाबतीत निकोप स्पर्धा झाली तर निश्चितच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. तसेच आपल्या उत्तम संशोधनाचे कृषी विद्यापिठांनी योग्य ते मार्केटिंग करावे. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी असे सत्तार म्हणाले.
शासनाच्या तसेच विद्यापिठाच्या अखत्यारीतील जमिनीवरही कृषी विभागामार्फत शेतीचे नवनवीन प्रयोग राबवून त्याची माहिती राज्याच्या सर्व भागातील शेतकऱ्यांना द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांचा पुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे तसेच बोगस बियाणे उत्पादकांवर कडक कारवाई करावी असे निर्देशही मंत्री सत्ता यांनी बैठकीत दिले. यावेळी राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगांवकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.