सोलापूर |
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र वायरल झाले आहे. या बनावट पत्रप्रकरणी एका निर्दोष तरुणाला गेवण्याचा Lakshmi शासन व प्रशासनाकडून होत आहे. ही कारवाई खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा व दोषींवर कारवाई करावी आणि या निर्दोष तरुणावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूरचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केली आहे.
राज्य सरकारने नुकताच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे 13 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर रोषातून अज्ञात व्यक्तीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करून ते सामाजमाध्यमांवर व्हायरल केले. या पत्रामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पोलिसांकडे केली होती.
राज्याचे गृह खाते आणि पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास न करता केवळ कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी घाईघाईने पुण्यातून एका होतकरू तरुणाला अटक करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात तरुण हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. या तरुणाचा त्या बनावट पत्राशी कुठलाही थेट संबंध नाही. विनाकारण एका सर्वसामान्य तरुणाला यात गोवण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेड या तरुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून कुठल्याही परिस्थितीत एका निर्दोष तरुणावरील कारवाई आम्ही खपवून घेणार नाही.
राज्याच्या गृहखाते आणि पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास करावा. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा लोकशाही मार्गाने आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्हाला याविरुद्ध लढा उभा करावा लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेड सोलापूरचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.