टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर आता जसप्रीत बुमराहच्या जागी कोणता खेळाडू निवडायचा हे आव्हान असणार आहे. मोहम्मद शमीला विश्वचषकासाठी बॅकअप खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले असल्याने त्याची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र शमीशिवाय बुमराहच्या जागी सिराजलाही ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते.
बुमराहच्या जागी निवडीसाठी बीसीसीआयकडे 15 ऑक्टोबर पर्यंतची वेळ आहे. पण बीसीसीआय 6 ऑक्टोबरपूर्वी बुमराहच्या बदलीची घोषणा करू शकते कारण म्हणजे वर्ल्डकपच्या तयारीसाठी टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या जागी टीम इंडिया नव्या खेळाडू सोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. आशिया कपमध्ये गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मोहम्मद शमीला टीम इंडियात परत बोलावण्यात आले. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही. मात्र विश्वचषकातील बॅकअप खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे बुमराहच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमीचे नाव आघाडीवर आहे.
विश्वचषक संघाचा भाग होण्याच्या मोहम्मद शमीशिवाय दीपक चहर देखील शर्यतीत आहेत. दीपक चहरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या T20 सामन्यात दीपक चहरने चांगली गोलंदाजी करताना दोन विकेट घेतल्या आणि आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.