तब्बल 12 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. मागच्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे.
त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. याशिवाय महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. उद्धव ठाकरेंनी भाजपला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली.
त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, यामागे सुद्धा संजय राऊत होते, पण आता सारं बदललं आहे. राऊत जेलमध्ये गेलेत. हळूहळू एकएकाचा नंबर लागेल. राऊतांनंतर आता अनिल परबांचा नंबर आहे, तेही जेलमध्ये जातील, असं रवी राणा म्हणाले आहेत.