“आमदार महाराष्ट्रात परतले तर फिरणे कठीण होईल,” संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा दाखला शिंदे गटाच्या लेखी उत्तरात देण्यात आला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत निवडणूक आयोगात निकाल देणार आहे. निवडणूक आयोगाने 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या लेखी उत्तरात शिंदे गटाने संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.
आम्ही पक्षातच आहोत पण आम्हाला हे पाऊल का उचलावं लागलं याचं कारण देताना शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. आमदारांनी 20 जून रोजी बंड केलं आणि सूरतला निघून गेले. ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली, असं ठाकरे गटाने म्हटलं. ठाकरे गटाच्या या दाव्याला प्रतिदावा म्हणून शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला देण्यात आला.
तसेच याआधी जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात सुद्धा शिंदे गटाने हाच दावा केला होता. त्याचं लेखी उत्तर काल शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सुप्रीम कोर्टाने तोंडी निर्देश दिले होते की अशाप्रकारच्या वक्तव्यांपासून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे.
त्यावेळी संजय राऊत यांचं हे वक्तव्य बंडखोर आमदारांसाठी इशारा समजलं जात होतं. आता या वक्तव्याचा कायदेशीर वापर शिंदे गट करु पाहत आहे.