मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) संजय राऊत यांच्याविरोधात पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं.
याप्रकरणीही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुन्हा ‘जेल की बेल’ याबाबत निर्णय होईल.गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये ईडीने म्हटलं आहे की, या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचं ईडीनं या आरोपपत्रात नमूद केलेलं आहे.
तसेच संजय राऊतांच्या जामीनाला विरोध करत ईडीनं स्पष्ट केलंय की, राऊत हे एक राजकिय व्यक्तिमत्व असल्यानं बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तापस महत्त्वाच्या टप्यावर असताना त्यांना जामीन देणं योग्य ठरणार नाही. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरानं ईडीनं अटक केली होती.