Latest Marathi News

BREAKING NEWS

विखेंची कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू

0

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं आघाडीच्या नेत्यांकडून सांगितल जात आहे. मात्र, अनेकवेळा मंत्र्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसकडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये शाब्दिक कलगीतुरा सुरु झाला आहे. यामध्ये आता शिवसेनेन उडी घेत विखे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी थोरातांची कमळा हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय!. अशा शब्दात विखेंचा समाचार घेतला आहे.

नेमक काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात
जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात. विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की,‘‘एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.’’ यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की,‘‘मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!’’ यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. अशी टीका सामनात करण्यात आली आहे.

काचेच्या घरात राहणार्यां नी दुसर्यां च्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात. विखे काँग्रेस पक्षात होते.

Leave A Reply

Your email address will not be published.