मुंबई | समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातांचीपुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करण्याची गरज असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केले. समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथे झालेल्या बस अपघाताबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
पुढे अजित पवार म्हणाले की, नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे असेही पवार यांनी नमूद केले.