शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर विनायक राऊत आणि उदय सामंत यांच्यातील वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कणकवलीत शिवसेनेच्या एका कार्यक्रमात विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. पालकमंत्री असताना उदय सामंत हे टक्केवारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. एवढेच नाही तर आमदार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला ५० लाख रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक नुकतीच कणकवलीत पार पडली. यावेळी हा गंभीर आरोप राऊत यांनी केला. शिवसेना कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना विनायक राऊत म्हणाले, ‘ राज्यात कुठेही घडत नाही, असे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथे घडते.
पैसे घेऊन जा, निवडणुकांना तिकिट देतो… पण माझ्याकडे अशा पद्धतीचा घाणेरडा प्रकार इथे होतो. ४० आमदार फुटले त्यापैकी ३९ आमदारांनी कधीही केला नसेल असा प्रकार इथे होतो. अडीच वर्षात त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचं काम केलं असा गंभीर आरोप सुद्धा लगावला होता