मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. दुध दरवाढीसाठी शनिवारी भाजपसह मित्र पक्षांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन म्हणजे दिखावा असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. तर शेट्टी यांना प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी कडाडून टीका केली आहे.
शेट्टी यांची अवस्था गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सुचत नाही.या उलट त्यांनीच दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले, अशी टीका खोत यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही, असा आरोपही खोत यांनी केला आहे.