“राज्यावरील संकटं दूर कर, प्रत्येक घरात सुख-समृध्दी येऊदे..!” अजित पवार यांचे बा विठ्ठलाच्या चरणी साकडे
मुंबई |
महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेव, राज्याची भरभराट कर, शेतकरी-कष्टकऱ्यांना यश दे, प्रत्येक घरात सुख-शांती, धनधान्याची समृद्धी येऊ दे, राज्यावरची संकटे दूर कर, असे साकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बा विठ्ठलाच्या चरणी घातलं असून राज्यातील जनतेला त्यांनी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्तिकी एकादशीनिनिमित्तानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी राज्याच्या कल्याणासाठी साकडं घातलं आहे. राज्याला नैसर्गिक आपत्तीच्या संकटापासून दूर ठेव. शेतकऱ्याच्या शिवारात पिकपाण्याची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊ दे. राज्यावरचं बेरोजगारी, महागाईचं, रोगराईचं संकट दूर कर. या राज्यातल्या बळीराजाला यश दे. राज्यातला प्रत्येक जण निरोगी, सुखी, समाधानी, आनंदी राहूदे. महाराष्ट्राची भरभराट होऊदे, असं साकडं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बा पांडुरंगाला घातलं आहे.