राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केल्यांनतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपेक्षित मतं मिळवली नसतील किंवा नियम पूर्ण केला नसेल म्हणून त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला असेल. मी तर दिवसभरात प्रवासात होतो. शेतकऱ्यांच्या शेतात चाललो आहे. मला माध्यमांकडूनच हे कळालं असे स्पष्ट मत बावनकुळेंनी मांडले आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेत उदय सामंत यांनी, “मला वाटतं हा आजच निर्णय झालेला नाही. यावर कित्येक दिवस निवडणूक आयोगात चर्चा सुरू होती. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचाच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढलेला नाही, तर तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचंही त्यात नाव आहे.” “‘आप’ पक्षाला नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत आणि त्यात काही पक्ष बसले नसतील म्हणून मान्यता रद्द झाली असेल,” असेही उदय सामंत यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निर्णयाविरोधात थेट केंद्रातील मोदी सरकारवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे . यापरी सुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालावर आघाडीने जोरदार टीका केली होती.