बंगालच्या उपसागराध्ये मोका चक्रिवादळानं थैमान घालण्यास सुरुवात केलेली असताना त्याचे परिणआम देशाच्या काही भागांमध्ये दिसून येत आहेत. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला या चक्रिवादळाचा धोका नसून, उलटपक्षी राज्यात सध्या हवामान बदलाचं पर्व सुरु झाल्याचं लक्षात येत आहे. थोडक्यात राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाली असून, काही भागांतून अवकाळी पावसाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढचे पाच दिवस राज्यातील उकाडा वाढणार आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढणार आहे. म्हणजेच या आठवड्याची अखेर आणि नव्या आठवड्याची सुरुवात ही उन्हाच्या झळा सोसतच होणार आहे हे आता स्पष्ट होत आहे. तिथं मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याचा इशारा असला तरीही मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागाला मात्र उष्णता वाढल्यामुळं दिवसातून काही तास अवकाळीचा मारा सहन करावा लागणार आहे. तुलनेनं कोकण आणि गोव्या नजीकचा भाग मात्र कोरडा राहील.
हवामान विभागानं जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिक या भागांमध्ये शनिवारी तापमान उच्चांग गाठेल असा अंदाज वर्तला. शुक्रवारी विदर्भात सर्वत्र पारा चाळीशीपार गेल्याचं पाहायला मिळालं, जिथं अकोल्यात तापमान 44.5 अंशांवर पोहोचलं होतं. उन्हाचा वाढणारा दाह पाहता नागरिकांना प्राथमिक स्तरावर काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात येत आहे.