मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात काल चौथ्यांदा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांसह ९ दिग्गज नेते शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे तर राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी झालोय असं अजित पवारांनी म्हटलं. तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर झळकलेल्या बॅनरची आत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली असून या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असं आवाहन या बॅनरमधून केले आहे. दादर परिसरातील लक्ष्मण पाटील या कार्यकर्त्याने हा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिलंय की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय असा मजकूर छापण्यात आला आहे.
२०१९ नंतर राज्याच्या राजकारणात सत्तापरिवर्तन झाले. भाजपा-शिवसेना यांनी युतीत निवडणुका लढवल्या त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपाला दूर सारून थेट विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र त्यानंतर अडीच वर्षात शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे ४० आमदार भाजपासोबत आले. त्यानंतर महाविकास सरकार कोसळले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता वर्षभरानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांसह ९ जणांनी बंड पुकारात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.