मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठं आहे? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरे भाजपचीच भूमिका मांडत असल्याची टीकाही दानवे यांनी त्यांच्यावर केली. तसेच शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांची नक्कल करत खिल्लीही उडवली. मुख्यमंत्री पदावर असताना तब्यतीचं कारण सांगून उद्धव ठाकरे यांनी कसं काम केलं, याची मिमिक्री करुन राज ठाकरे यांनी दाखवले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भजपोसोबत सत्ता स्थापन केली. यावरून शिंदे यांनी रात्रीतून जादूची कांडी फिरवल्याने आता ते सगळीकडे फिरत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायाचा आणि कोपऱ्यात जायचा, असं आमचं काम नाही, स्वार्थासाठी आम्ही कधीच आपल्या भूमिका बदलल्या नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी आजारपणातही उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडली. जागतिक स्तरावर धारावी पॅटर्न नोंदविला गेला. उत्तर प्रदेशमध्ये नदीमध्ये प्रेत सोडण्यात आली. गुजरातमध्ये तीन-तीन दिवस रुग्णांना बेड मिळाला नाही, याची आठवण करून देत दानवे यांनी राज ठाकरेंना सुनावले.